कोविड पॉसिटीव्ह असणे हे इतर लोकांच्या दृष्टीने घृणास्पद आहे. लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन लगेच बदलून जातो. याला काहीतरी महामारी झाली अशी भावना निर्माण होते. पण का?
लोकांच्या कोविड बद्दल बरेच गैरसमज आहेत. याच गैरसमजातून लोक ताप, सर्दीसाठी डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी वाफ घेणे, गोळ्या खाणे असे उपाय करत असतात. कोविड टेस्ट करणे ही फारच दूरची बाब आहे. याचा परिणाम म्हणजे अत्यंत भयंकर अवस्था जिथे ऑक्सिजनचं लावावा लागतो. मग अशा परिस्थितीत प्राणपण गमवावे लागतात.
कोविड वर उपाय एकच, तो म्हणजे घरगुती उपाय न करता चांगल्या डॉक्टरांचा सल्ला आणि औषधोपचार करणे. मुख्य म्हणजे कोविडबद्गल गैरसमज मनातून काढणे. सुरवातीच्या लक्षणे असतील तर कोविडला हरवणे सोपे आहे. अंगावर आजार काढू नका.
सरकारने त्यांच्या परीने फारचं चांगल्या सुविधा केल्या आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये न जाणे हे आरोग्य आणि खिश्याच्या दृष्टीने चांगले.
कोविड झाल्यास फक्त आपल्या आयुष्यातील १४ दिवस सरकारच्या कोविड सुविधेत व्यतीत करा, पैसा खर्च न करता, अगदी मोफत. सरकारने २४ तास वैद्यकिय सेवा उपलब्ध केली आहे.
मी ज्या मुलुंड मुंबई येथील कोविड सेंटरमध्ये आहे तिथे संपूर्ण वॉर्ड हा वातानुकूलित आहे. जेवणाची पूर्ण व्यवस्था. २४ तास वैद्यकीय सेवा आणि तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. २४ तास रुग्णांवर लक्ष ठेवले जाते. अश्या वैद्यकिय सुविधा कायमस्वरुपी असाव्यात.
मान्य आहे अजूनही सुधारणा करण्याची गरज आहे. पण आपले बोलणे ऐकले जाते आणि त्यानुसार बदल होत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे.
मी पहिल्यांदाच एखादा सरकारी फॅसिलिटीतील माणूस चक्क सौजन्याने सेवा देताना पाहिले. इथला सर्व मेडिकल स्टाफ, वॉर्ड बॉय तसेच हॉउस किपिंग स्टाफ अत्यंत सौजन्यशील तेही PPE किट चे ओझे बाळगून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहे.
सरकारी हॉस्पिटल म्हणजे अस्वच्छता हे समीकरण बदलून टाकले आहे. दिवसातून 5 ते 6 वेळा वॉर्डाची साफसफाई, निर्जंतूकीकरण होते.
कोविडने आपल्याला काय दिले?
कोविडने आपल्याला कठीण परिस्थितीत संघर्ष करण्याची ताकद आणि उच्च दर्जाची वैद्यकिय सुविधा.
आता सुरु असलेले कोविड सेंटर बंद न करता नंतर इतर रुग्णांसाठी आपण वापरू शकतो. लोकही अशा वैद्यकिय सुविधेसाठी माफक दर भरू शकतात.
कोविड बरा होतो ही एकचं गोष्ट लक्षात ठेवा. कोविडबद्गल असलेले सगळे गैरसमज दूर करून कोविडचा सामना करूया.